Saturday, November 29, 2008

आपण हे युद्ध जिंकलो की हरलो?

पाकिस्तानच्या फक्त १०-१२ अतिरेक्यांसमोर आपण आपले वीसएक अधिकारी (पोलिस, सैनिक, कमांडो) गमावले, शेकडो नागरीक मृत्युमुखी पडले, अब्जावधींची संपत्तींची राखरांगोळी झाली। त्यामुळे ही लढाई संपल्यानंतर मोहिम फत्ते झाल्याचे बिगुल वाजवायचे की हे आपले अपयश समजायचे याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा .

मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला नव्हताच॥ ते होते एक भयानक युद्ध ! रणांगणावर कधीही जिंकू न शकले-या पाकिस्तानने कायमच हे असले भ्याड पर्याय निवडले आहेत। या युद्धात ताबा मिळवायला भारतीय लष्कराला आणि पोलिसांना जवळपास ५९ तास लढा द्यावा लागला. या वेळेत आपण कायकाय गमावले याचा विचार करता, आपण जिंकलो असे म्हणणे धाडसाचे ठरले. या युद्धाने अनेक प्रश्न पुन्हा उभे केले आहेत. मार्च १९९३मध्ये मुंबई बाँबस्फोटाच्या मालिकेने हादरली होती. नंतर लोकलमध्ये स्फोट घडवले गेले. बेस्ट प्रवासी बाँबस्फोटात बळी गेले. प्रत्येक वेळी आपण कोणत्या आघाडीवर कमी पडतो याची चर्चा झाली. पण यातून ठोस उत्तर शोधण्याचा मार्ग निघाला नाही. हे अपयशच अतिरेक्यांचे बळ वाढवत गेले आणि आज ही वेळ आपल्यावर ओढवली. आणि एकंदर आपली राज्यपद्धती आणि राज्यकर्ते यांच्याकडे बघता पुन्हा याहून भीषण काही घडणार नाही असा विश्वास बाळगणे कठीण आहे.

भारत हे सॉफ्ट टार्गेट आहे याची खात्री आपले शेजारी देश बाळगून आहेत। शाब्दिक निषेधापलिकडे येथील सत्ताधारी जात नाहीत याचा अनुभव आपण पाकिस्तानने वारंवार घेतला आहे. आणि हे फक्त काँग्रेसबद्दल बोलून चालणार नाही तर देशभक्तीचा मक्ता आपल्याकडे आहे असे मानणाऱ्या भाजपाचा अनुभवही आपल्याला काही वेगळा नाही. सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानची मदत असणा-या अतिरेक्यांनी थेट संसदेवर हल्ला चढवला. तेव्हा अपेक्षा होती ती पाकिस्तानने पुन्हा असा आगाऊपणा करू नये असा कृतीने इशारा देण्याची. प्रत्यक्षात भाजप सरकारने पुन्हा तोंडाची वाफ दवडली. इतकेच नव्हे तर पाकिस्तानशी संबंध सुरळीत होण्याचे प्रयत्न केले. लाहोर रेल्वे सुरू केली.पाकिस्तानी नागरिक येथे होण्यातील अडचणी कमी केल्या. भाजपाचे तेव्हाचे परराष्ट्र मंत्री जसवंतसिंग यांनी महमद अझर मसूद याला विमानाने घेऊन गेले आणि त्याच्या अतिरेकी साथीदारांच्या हाती सोपवले. कारण त्यांनी, इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अफगाणिस्तानमध्ये कंदहार येथे अपहरण केले होते. याहून या देशाचा अवमान कोणी केला नसेल. हेच जसवंतसिंग लष्करामध्ये अधिकारी होते हे लक्षात घ्यायला हवे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानी कलाकार भारतात येऊन भरपूर कार्यक्रम करत आहेत. लक्षावधी रूपये कमावत आहेत. अदनान सामी तर भारताचा नागरिक झाला की काय असे वाटावे अशी स्थिती आहे. त्याच्याकडे पॅनकार्डही आहे. पण भारतीय कलाकारांना पाकिस्तानमध्ये मुक्तपणे आमंत्रण मिळत नाही. अर्थात त्या देशातील गोंधळ बघता, तेथे कोण जाईल हा प्रश्नच आहे. भारताच्या या धोरणात शहाणपणा आहे यात शंका नाही, कारण आमची इच्छा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याची आहे, पण शेजारी नाठाळपणा करतो आहे असे ते जगाला दाखवत आहेत. या व्यूहरचनेमुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडता येतील अशी भारताला आशा होती. पण या धोरणाचा दुसरा भाग असा असायला हवा की पाकिस्तानला धडा शिकवण्याची आमची धमक आहे. पाकिस्तानवर घी देखा, लेकिन बडगा नही देखा अशी वेळ आपण आणायला हवी होती. पण पाकिस्तानला सरळ करण्याच्या नादात पाकिस्तानचे विघटन होईल, पाकिस्तान अतिरेक्यांच्या ताब्यात जाईल, या देशाकडे असली अण्वस्त्रे त्यांच्या हाती गेली तर भारतासह अनेक देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील वगैरे सांगितले गेले आणि भारत या दबावाला बळी पडला. यामुळे पाकिस्तानची मग्रुरी वाढत गेली. यात भर पडली ती पाकिस्तानला अमेरिकेने संरक्षण दिल्याची. भारताला शह देण्यासाठी आणि भारतीय उपखंडात पाय रोवण्यासाठी अमेरिकेने हे धोरण स्वीकारले, पण त्याचा फटका अमेरिकेला बसला आणि भारतालाही. मुळात पाकिस्तानचे धोरण भारतविरोधी असणार हे दोन्ही देश स्वतंत्र झाले तेव्हाच उघड झाले होते. स्वतंत्र झाल्यावर काश्मीरवर हल्ला करून पाकिस्तानने आपला उद्देश स्पष्ट केला होता. तेव्हापसून काश्मीर समस्या आपल्याला त्रास देते आहे. या निमित्ताने या समस्येचाही कायम सोक्षमोक्ष लावता येईल. मुख्य म्हणजे भारत हा शक्तीमान देश आहे हे जगाला कळेल. पण हे होणे कठीण आहे. कारण आपण या दृष्टिने विचारच करत नाही. अहिंसेचे तत्त्व आपण जास्तच अंगिकारले आहे. भगवतगीतेत, ठकासी व्हावे ठक हा उपदेश आपण विसरलो आहोत. धर्म, देश रक्षणासाठी प्रसंगी हाती शस्त्र घ्यावे असे भगवंतांनी म्हटले आहे. जे पाकिस्तानबाबत तेच आपण बांगलादेशबाबत धोरण अवलंबायला हवे आहे. बांगलादेशातून भारतात सतत लोंढे येत आहेत. आसामात तर काही वर्षांत बांगलादेशींचे बहुमत होईल, मग स्वतंत्र आसामची चळवळ सुरू होईल. मुंबईतील काही मतदारसंघातही बांगलादेशी आमदार, नगरसेवक ठरवतील असे चित्र आहे. या शिवाय या घुसखोरांमध्ये अतिरेकी नसतील याची खात्री कोण देणार? किंबहुना गेल्या काही वर्षांत देशभरात झालेले अतिरेकी हल्ले हे अशाच घुसखोरांच्या संगनमताने झाले. भारत सरकार असे बोटचेपेपणा दाखवते याचे प्रमुख कारण, या समस्येकडे सरकार हिंदु आणि मुसलमान या चष्यामूत बघते. संसदेवर झालेल्या हल्ल्यात अफझल गुरू याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. पण केंद सरकार त्याची कार्यवाही करत नाही, कारण गुरू हा मुसलमान आहे आणि त्याला फाशी दिली तर मुसलमान समाज हिंसक प्रतिक्रिया देईल अशी भीती सरकारला वाटते. मुळात अशी भीती सरकार एका समाजाबाबत बाळगते हीच चिंताजनक बाब आहे. पाकिस्तानला धडा शिकवला तर येथील मुसलमान काय करतील अशी भीती सरकारला वाटते. पण यापूर्वी पाकिस्तानशी झालेल्या लढायांमध्ये हा समाज देशाबरोबर राहीला हे आपण लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तानला अटकाव केला तर मुसलमान देशांत काय प्रतिक्रिया उमटेल अशीही शंका आपल्याला वाटते. खरे म्हणजे या देशांना भारताला सहजासहजी दुखावणे परवडणारे नाही. शिवाय प्रत्येक देशाला आपले हित सांभाळायचे असते. पाकिस्तानला कदाचित ते सहानुभूती दाखवतील. आणि पाकिस्तानला आपण सांभाळून घेत आहोत म्हणून येथील अतिरेकी कारवाया कमी झालेल्या नाहीत हेही विसरता येणार नाही. या कारवायांमध्ये पाकिस्तानचा थेट हात असतो याचेही सबळ पुरावे आपल्याकडे आहेत. या निमित्ताने लष्करातून कर्नल पदावरून निवृत्त झालेले अनील आठल्ये यांनी एक वेगळाच मुद्दा मांडला आहे. काश्मीरमध्ये परकीय घुसखोर मारले गेले त्यांच्यासाठी वेगळे दफनस्थळ आहे. त्यांना त्यांच्या देशांकडे सुपुर्द करायला हवे होते. आता या युद्धातही ठार झालेल्यांना सन्मानाने दफन केले जाईल. त्या ऐवजी त्यांचे मृतदेश पाकिस्तान सीमेवर ठेवावेत, पाकिस्तानने ते घेण्यास नकार दिल्यास त्यांची विल्हेवाट लावावी. पण त्यांचे सन्मानाने दफन करू नये. पर्यायाने त्यांना स्वर्गवासी होण्याचे पुण्य आपण काय द्यावे असा सवाल ते करतात. आपल्या सहिष्णुततेचा विपरित अर्थ आपल्या शत्रूंनी लावू नये हा मेसेज देण्याची गरज आहे. भारताने आज कणखरपणा दाखवायला हवा कारण सध्या जगभर वातावरण अतिरेकीविरोधी आहे. अमेरिकेसारखा बलाढय देण, सुपरपॉवर बनण्याचेे प्रयत्न करणारा चीन, युरोपातील बहुसंख्य देश, एव्हढेच नव्हे अनेक मुस्लीम देशही या अतिरेकी कारवायांनंी त्रस्त आहेत. त्यामुळे या लढयाला भारताला बराच पाठिंबा मिळेल हे नक्की. निदान निवडणूक जवळ आली असताना, राजकीय फायद्यासाठी तरी हे सरकार राजकीय इच्छाशक्ती दाखवेल अशी आशा आपण बाळगायला हरकत नाही.

मुळ लेख : महाराष्ट्र टाईम्स (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3772539.cms)

Monday, September 15, 2008

नको नको रे पावसा

इंदिरा संतांची ही कविता
वाचून मला माझ्या लहानपणीच्या घराची आठवण झाली...

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली ॥

नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली आणू भांडी मी कुठून ॥

नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ अशी मातीत लोटून ॥

आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझं नेसूचं जुनेरं नको टाकू भिजवून ॥

किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना ॥

वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत
विजेबाई कडाडून मागे फिरव पांतस्थ ॥

आणि पावसा, राजसा, नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन ॥

पितळ्याची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ॥
-- इंदिरा संत

Saturday, June 28, 2008

Children of Heaven



"Children of Heaven" ही मजीद मजीदी ची अतिशय सुंदर कलाकृती आहे. मला इतर ratings बद्दल कल्पना नाही पण मी बघितलेल्या चित्रपटांमधील सुंदर चित्रपट हा आहे. (फक्त विधानाच्या पुष्टिकरीता म्हणुन सांगतो: माझा बरासचा वेळ मी कंप्यूटरच्या आणि सिनेमाच्या पडद्यासमोरच घालवतो.) एका बहिण-भावाच्या छोट्याश्या जगात घडणारी ही कथा. हयात कुठे romance नाही, संघर्ष नाही, मारामारी नाही किंवा "सुंदर गाणी अणि तूफ़ान हाणामारी" सुद्धा नाही. तरीही हा चित्रपट तुम्हाला आवडतो कारण सहज सोप्पी आणि सुंदर कथा व कलाकारांचा जिवंत अभिनय. Amir Farrokh Hashemian(अली) आणि Bahare Seddiqi(झाहरा) या बालकलाकारानीं आपल्या अभिनयाने चित्रपटात जीव ओतलाय, नक्कीच तेवढेच श्रेय मजीद मजीदीचे देखिल आहे।
एक दिवस अली कडून झाहरा चे shoes हरवतात. खुप प्रयत्न करूनही ते काही सापडत नाहीत. वडील एवढे गरीब की आजारी बायकोच्या च्या उपचारासाठी ते कसबसे पैसे देतायत, shoes साठी पैसे कुठून देणार? अली झाहरा ला आई वडीलाना काही न सांगण्याची गळ घालतो... पण shoes चे काय? मग अली चे shoes दोघांनीही वापरायचे असे ठरते. आणि त्यांच्या समोर वेगवेगळ्या अडचणी उभ्या रहातात. झाहराचे अली ला उशीर होऊ नये म्हणुन शाळेतुन शक्य तितक्या लवकर पळत पळत अली कडे येणे. यातुनाही अली ला उशीर होउन शिक्षकांचे अलीला रागावाने. शिक्षकांची मुलांच्या अडचणी हताळण्याची कोडगी पद्धत सगळेच कसे अगदी आपल्या-कडील परिस्थितीशी मिळते-जुळते. या सगल्या अडचणींतही मुलांचा निरागसपना टिकून आहे हे वारंवार जाणवते. ह्या सगळ्यांतुन एक उपाय शेवटी अली ला सापडतो. एका marathon मध्ये तीसरे बक्षिस असते shoes. ते जिंकुन तो झाहरा ला तिचे shoes परत देण्याचे ठरवतो. पुढचे चित्रपटातच बघण्यात मजा आहे....marathon नंतरचा प्रसंग मजीद ने आपले सगळे कौशल्य वापरून चित्रित केलाय!
अतिशय योग्य जागी दिलेले संयत संगीत ही चित्रपटातील आणखी एक जमेची बाजू. बर्याचश्या आनंदी प्रसंगामध्ये रंग भरण्याचे काम संगीतकाराने चोख पार पाडलेले आहे. चित्रपट इरानी आहे परन्तु मला तो बघताना भाषेचा अडसर अज्जिबात जाणवला नाही. हा पहिला ईरानी चित्रपट जो "Best Foreign Language Film" या ऑस्कर अवार्ड साठी nominate झाला. त्यावेळचा ऑस्कर मात्र Life Is Beautiful ला मिळाला. तो सुद्धा तितकाच सुंदर चित्रपट!
children of Heaven सुंदर आहे याबद्दल कुठलीही शंका नाही. परन्तु जर तुम्हालाही त्यात तुमचे लहानपणी प्रसंग आठवले तर मात्र तो तुम्हाला तुमचाच वाटेल. तुमचे भाऊ-बहिण, छोटी छोटी भांडणे रुसवे फुगवे. आनंदाचे काही क्षण हे सगळे. ही सिनेमा तटस्थ पणे बघुन तुम्ही याचे कौतुक करू शकता किंवा अली आणि झाहरा बरोबर वहावत जाऊन तुम्ही त्यांचा आनंद आणि दू:ख शेयर करू शकता, choice तुमची आहे.
Children of Heaven

Friday, June 27, 2008

बाबांचा अभ्यास

बाबांचा अभ्यास
बाबा लोक(म्हणजे वडील लोक... ते वाले बाबा लोक नाही) मुलांचा अभ्यास कसा घेतात?
----
"ग्रहणं म्हणजे काय बाबा?", मी म्हणालो; "ग्रहण म्हणजे... ह्म्म्म ग्रहण म्हणजे...", बाबा थोड़े विचारात पडल्यासारखे दिसले. "अरे ग्रहण म्हणजे तोंडाला काळे फासने! हूँ. परवाच में एक अग्रलेख लिहिलाय 'कांग्रेस च्या लोकप्रियतेला ग्रहण." "पण हे ग्रहण कसं होतं?". "कसं होतं म्हणजे? एवढं नाही माहिती? कमाल आहे बाबा...", बाबा खेकसलेच. मी फ़क्त मान डोलावली. तेवढ्यात स्वयंपाकघरातून चर्रर्र असा आवाज आला. बाबानी नाक वर ओढलं, "मध्या, आईने पीठलं केलय का रे आज?". मीही नाक वर करून जोरात वास घेतला. फुर्र करून "विचारून घेऊ का आईला?". "नको,नको नको विचारू नकोस." बाबा घाई घाईने म्हणाले. "उगीच आपली चौकशी केली रे...बाकि... हे... पीठलं असलं तर बरं होइल म्हणा." "तुम्हाला खुप आवडत पीठलं बाबा?" मी विचारले. "खुप" . "मला पण आवडतं!"-मी. "छान छान", बाबानांही समाधान वाटल्यासारखे दिसले. मग मी हळूच पुढे सरकलो, टेबलाजवळ गेलो. "मी थोड़े दाणे घेऊ का बाबा, यातले थोड़े?" "हाँ घे, पण थोड़े घे थोड़े मला ठेव." बशीत हात घालून मी शेंगादाणे उचलले आणि तोंडात टाकले. बाबांनीही थोड़े तोंडात टाकले. आम्ही दोघेही थोडावेळ तोंड हालवत गप्प बसून राहिलो. तोंड रिकामं झाल्यावर मग मी म्हंटले "सांगाना बाबा मग, हे ग्रहण कसं होतं?"... "वर्गात नाही का सांगितल तुला गुरुजींनी?" "शान्गितलं, पण नीट कळलं नाही मला.". "ह्याट च्या, तू तर असा रड्या आहेस, मध्या.". "पण सांगा नं", मी हट्ट्च धरला." "अरे ग्रहण sss", असं म्हणुन बाबांनी जे डोळे मिटले बराच वेळ ते उघडलेच नाहीत. मला तर वाटले बाबाना झोप लागली की काय. म्हणुन में पुन्हा त्याना हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. मग त्यानी पुन्हा ते डोळे उघडले. मी पुन्हा त्याना तो प्रश्न विच्याराल्यावर मग मात्र ते ज़रा त्रासलेलेच दिसले. मला म्हणाले, "अरे म्हणजे काय गम्मत आहे माहीत आहे का? ह्या सम्बन्धी ज़रा मतभेद आहेत."... "मतभेद? म्हणजे?", मी उत्सुकतेने विचारले. "आता मतभे S द म्हणजे..." बाबानी दोन्ही हात असे इकडे तिकडे फिरवून बराच वेळ मला काहीतरी सांगितले. पण मला एक अक्षरही समजले नाही. "बरं बरं, ते जाऊ दे आता. तुला पंचांग माहीत आहे का, पंचांग? मग झालं तर. अरे पंचंगामध्ये सगळी ग्रहण दिलेली असतात." "पण हे ग्रहण होतं कसं?"-मी "आता होतं कसं? हा काय प्रश्न आहे? अरे ग्रहणं ही होणारच! पंचंगावाल्यांनी सारख्या तारखा ठरवलेल्या असतात त्यादिवशी ग्रहण बरोबर होतं". बाबांनी मग आणखी मला काही माहिती सांगितली त्यावरून मला खूउप नविन द्यान मिळालं. त्यांच्या बोलान्यवारून मला कळलं की पंचांग वाले लोक असतात ते पहिल्यांदा ग्राहनाच्या तारीख ठरवून टाकतात. ते म्हणाले की अमुक अमुक दिवशी सूर्यग्रहणं बुवा, की सूर्य येतो आणि ग्रहण करून निघून जातो, सोप्प! त्यानीं चंद्रग्रहण म्हंटल की चंद्र येतो आणि ग्रहण करून निघून जातो. त्यात कद्ध्ही चुक होतं नाही. त्या दिवशी बरोबर सुर्याच्या अंगावर काळे पट्टे दिसतात. लोक इकडे "दे दान सुते गिर्हान", असे म्हनू लागले की तिकडे ग्रहण खलास. पूर्वी राहू केतु त्यानां गिल्तात अशी समजूत होती. पण आता नविन द्यानामुळे ते खोट ठरले. आता पंचांग वालेच त्याना गिळतात असं सिद्ध झालेल आहे. एवढी माहिती सांगितल्यावर बाबा घाई घाईत म्हणाले, "हम्म पुरे आता पूरे, समजल ना? ती फेकून दिलेली पुस्तके इकडे आण." मी आश्चर्याने म्हणालो, "आता काय करायच पुस्तक बाबा? मला समजल छान. आणि पुस्तकात काहीतरी भलतच दिलय बाबा." "अस बघू बघू तर काय दिलय ते?" मी पुस्तक उचलून बाबांजवळ दिले, बाबांनी त्यातली पानं चाळली. पुन्हा काहीतरी वाचाल. ज़रा त्यांचा चेहरा पुन्हा ज़रा उतरला अस मला वाटल. मी काही विच्यारायच्या आताच ते म्हणाले, "मध्या, ही सगळी माहिती तुला अत्ता सांगितली ती तुला लक्ष्यात राहिली?" "होsss." "मग सांग बघू." मी थोडसं काहीतरी सांगितल पण थोडसं काय काय आठवेना, आजिबात काही आठवेना. आत्ता बाबा रागावनार अशी मला भीती वाटली. पण त्यांचा चेहरा ज़रा हसतमुख झाला. "हा हा, विसरलास ना? काय हट लेका तुझी. जाउदे. आता मी पुस्ताकातलाच वाचून दाखवतो थोड निराळं आहे पण तेच लक्ष्यात ठेव." एवढं सांगुन बाबा मला पुस्तकातला धडा वाचून दाखवू लागले. बशितल्या दाण्याकडे लक्ष्य ठेवत मी ते ऐकत राहिलो...
-----
द. मा. मिरासदारांची कथा "बाबांचा अभ्यास" चा हा काही भाग. मला खुप आवडली. आमच्या बाबानां हां आनंद आम्ही फारसा देउच शकलो नाही. हॉस्टल ला आलो आणि ती जबाबदारी रेक्टर वर आली. त्यानिही ती छड़ी अणि शिस्ती ने इमाने इतबारे पार पाडली(आणि आमची मस्तच लागली.) असो. मिरासदारांच्या तक्रार, आमंत्रण ह्या कथाही वाचन्या सारख्या आहेत. बर्याचश्या "मिरासदारी" मध्ये आहेत.
द मा मिरासदार ग्रामीण बाजाच्या कथा छान लिहित. तितक्याच खुमासदार ग्रामीण कथा लिहिणारे दुसरे लेखक शंकर पाटिल. त्यांच्या कथांबद्दल नंतर कधी तरी.

Wednesday, April 30, 2008

गुलजारची गाणी : कल्पनेच्या भरा-यांकडून वास्तवतेच्या पाय-यापर्यंत

{ महाराष्ट्र टाइम्स वरील गुलजार च्या गाण्याबद्दलच्या लेखा मधील काही भाग थोडक्यात }

'मुझको कोई अपना दे जा
मुझको कोई सपना दे जा
हल्का फुल्का शबनमी
रेशम से भी रेशमी...
''सदमा' सिनेमातल्या गाण्यातल्या या ओळी। एखादं मोरपीस गालावरून फिरावं इतक्या हळुवारपणे हे शब्द आपल्या मनाला मोहरून टाकतात. गुलजारच्या अशा मुलायम शब्दांबाबत बोलण्यासाठीही आपल्याकडेच शब्द शिल्लक राहत नाहीत.

गुलजार म्हटलं की कानात अनेक गाणी रूंजी घालू लागतात। एरवी फिल्मी गाणी आपल्याला पटकन आठवत नाही. पण 'थोडीसी बेवफाई'मधलं राजेश खन्नावर चित्रित झालेलं 'हजार राहे मूड के देखी, कही पे कोई सदा न आई...' हे गाणं एकदा रेडिओवर ऐकलं आणि प्रश्न पडला... इतक्या वर्षांनंतरही इतकं ताजं का वाटतं? काही उलगडाच होईना. मग कधीतरी या गाण्याचे गीतकार गुलजार असल्याचं ऐकलं आणि या ताजेपणाचं रहस्य लक्षात आलं. गाणं कधीही जुनं वाटणार नाही, असे हुकमी शब्द वापरण्याचं सामर्थ्य गुलजारकडे आहे. आजच्या संदर्भात बोलायचं झालं तर 'आंखे भी कमाल करती है पर्सनल से सवाल करती है...'असं गुलजार सहज लिहून जातो. त्यातला 'पर्सनल से सवाल' आपल्याला खटकतही नाही. आपल्या रोजच्या बोलण्याच्या भाषेत अशा अनेक शब्दांचा वापर सहज करत असतो. त्यामुळेच अशी रचना शब्दही आपल्याला परकी न वाटता आपलीच वाटू लागते.

हिंदी सिनेमातल्या गीतकारांच्या गर्दीत गुलजार नेहमीच वेगळा वाटतो। त्याच्या गाण्यातले शब्द, प्रतिमा, उपमा कधीही परग्रहावरच्या वाटल्या नाही. प्रत्यक्षात त्याच्या गाण्यातल्या अनेक प्रतिमा या खरं तर आपल्या कल्पनेपलीकडच्या...आवाक्यापलीकडच्या. पण त्या इतक्या सहजतेने वापरलेल्या असतात की आपण नकळत हळवं होऊन जातो. 'एकसो सोला चांद की राते...' असं म्हणत गुलजार उपमांच्या आकाशात नेतो आणि मग अचानकपणे त्याच्या पुढच्या 'और तुम्हारे कांधे का तील' या शब्दांतून तो आपल्याला उपमांच्या आकाशातून अलगद जमिनीवर आणून सोडतो. वास्तव आणि कल्पनेच्या जगात गुलजार अतिशय सहजतेने वावरतो. पण आपण मात्र कधी त्याच्या वास्तवात जमिनीवर वावरतो, तर कधी त्याच्या रोमँटिझम'च्या आकाशात फिरू लागतो... अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला गुंतवून ठेवण्याची, बंदिस्त करण्याची ताकद केवळ गुलजारमध्येच आहे.

सिनेमासाठी गाणी लिहणारा म्हटलं की तो शायर राहत नाही। हव्या त्या चालीवर शब्द बांधून देणारा गीतकार ठरतो. जेव्हा सिनेमाला चांगली पटकथा, मेलोडिअस संगीत असायचं, अशा वेळी गुलजारच्या शब्दाला वेगळीच चमक यायची. 'आंधी'मधलं 'इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते...' किंवा 'मौसम'मधलं 'दिल ढुंढता है फिर वोही, फुरसत के रात दिन...' ऐकताना हे फिल्मी गीत आहे, असं म्हणण्याचा कोणी मूर्खपणा करणार नाही.

सिनेमात रूळलेली माणसं सिनेमाशिवाय कशाचा विचार करत नाही। त्यांच्या माणूस म्हणून सिनेमाखेरीज कोणत्याच संवदेना शिल्लक राहत नाहीत. पण गुलजार कवी म्हणून संवेदनशील आहे, तसाच तो पटकथा लेखक, संवादलेखक म्हणूनही आहे. 'साथिया' सिनेमातल्या एका गाण्यात, 'दोस्तो से झुठीमुठी दुसरो का नाम लेके तेरी मेरी बाते करना' किंवा 'सत्या' सिनेमात 'सारा दिन रस्ते पे खाली रिक्षेसा पिछेपिछे चलता है' इतकं वास्तववादी लिहतो. पण याच सिनेमातल्या 'बादलों से काट काट के कागजो पे नाम जोडना' असं लिहून गुलजार एकदम स्वप्नाळू उपमा देऊन जातो. किंवा अनेकदा आपण कधी त्यांनी वापरलेल्या उपमांनी थक्क होतो. तरी 'गीला पानी', 'कांच के खाब', 'कोहनी के बल पे चलता चांद' अशा उपमा सहजपणे त्याच्या फिल्मी गाण्यात येऊन जातात.

'दिलसे रे' गाणं ए। आर. रहमान आणि शाहरूख खानचं. या दोघांच्या तरुणाईत गुलजारचे शब्दही तितक्याच ताकदीने तरुण झाले होते. 'चल, छय्या छय्या' म्हणताना आपण नकळत कधी ताल धरतो ते कळत नाही. पण 'ऐ अजनबी, तू भी कभी आवाज दे कहीं से...' म्हणताना त्यातला शायर अजूनही कायम आहे, हे सांगून जातो. 'घर' या सिनेमासाठी गुलजारने एकाहून एक सरस गाणी लिहिली. 'कांच के खाब है, आंखो में चुभ जायेंगे', असं लिहणारा गुलजार 'बोतल से एक रात चली है, खाब उडाके रात चली है', असंही म्हणतो. त्यामुळेच तो अजब रसायन असल्याची खात्री पटून जाते.

गुलजार काळाप्रमाणे, नव्या पिढीप्रमाणे बदललाय। पण त्याच्या जुन्या कवितांमधला, गाण्यांमधला फ्रेशनेस मात्र अजिबात कमी झालेला नाही. म्हणूनच तर तो आजच्या पिढीला जितका आपला वाटतो, तितकाच आधीच्या पिढ्यांनाही. मग ती पिढी ग्रामीण भागातली असो वा शहरी॥!

{ मूळ लेख बघण्यासाठी इथे click करा महाराष्ट्र टाइम्स }

Saturday, April 26, 2008

वनवास

"वनवास" हे नाव वाचल्यावर मला वाटले की हे पुस्तक थोडे गंभीर स्वरुपाचे असेल... मी बस मध्येच ते वाचायला घेतले आणि माझे मलाच आठवत नाही की पुस्तक वाचतानां मी कितीदा मोठया मोठयाने हसलो आणि ... खरे सांगायचे तर ... काही वेळा रडलो देखील...

काही कथासंग्रह विनोदी असतात तर काही गंभीर; हा मला माझा वाटला! प्रकाश नारायण संतानीं, वनवास चे लेखक, कुठलाही आव न आणता लम्पन ची कथा त्याच्याच शब्दांत कागदावर उतरवलीय. एका शाळकरी मुलाचे सुन्दर जग... त्याचे आयुष्य, ते वातावरण; वाचता-वाचता आपणही लम्पन बरोबर त्याच्या गावात पोहचतो, मग सुमीमध्ये आपल्याला आपल्या बालपणाची हरवलेली मैत्रिण सापडते, गुन्डीमठ रस्ता आपल्या गावातल्या गल्ली सारखा वाटतो आणि आईची खुप खुप आठवण येते...मन दूर भुतकाळात जुन्या दिवसांच्या गावी जाते, तुम्हाला आठवतात शाळेतल्या गमती, तुमच्या शेजारी बसणारे मित्र...तुमच्यावर रागावणारे तुमचे आज्जी आजोबा, आईच्या हातचा मार, तुम्ही लटके रागावुन घरातून रुसून गावातील मंदिरात गेले होते तो प्रसंग, मग आईने तुमची काढलेली समजूत, त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, सुरपारम्ब्या... आणि बरेच काही! आणि यामुळेच तुम्हाला हा कथासंग्रह तुमचा वाटतो।

हा लम्पन त्याच्या आज्जी आजोबांकडे राहतो. तो तिथेच शाळेत जातो. कर्नाटकातील कुठलेशे हे सुंदर गाव तिथे एक तळे आहे, मारुतीचे मन्दिर आहे, गावाबाहेर छान छान शेतं आहेत... लम्पन चे आजोबा अणि लम्पन ची खास मैत्री आहे ते त्याच्यावर फारसे रागावत वगैरे नाहीत... आज्जी मात्र थोsssडी म्याड आहे कारण ती कधी रागावते अणि कधी माया करते. सूमीचे आजोबा मात्र खुप खाष्ट आहेत, कारण भूगोल त्यांचा आवडता विषय आहे आणि लम्पनने एकोनिसशे सत्ताविस वेळा वाचुनही तो त्याच्या लक्षात राहत नाही. लम्पंची आई-बाबा त्याची म्याड बहिण मनी आणि बिट्ट्या त्याला कधी कधी भेटायला येतात... ते दिवस मात्र तो जपून ठेवतो।

ह्या लम्पनच्या गोष्टी "एकदा नाही दोनदा नाही अठावीसशे तीस वेळा जरी म्याड सारख्या वाचाल्या" तरी ताज्याच वाटतील. सुमीला बघितल्यावर त्याचे पाण्यात खोल गेल्यासारखे वाटने, तिने काही विचारल्यावर, आजी काचेचे भांडे जेंव्हा जपून घेउन जायला सांगते तेंव्हा सारखी पोटात गडबड होणे. सगळेच अप्रतिम आहे. त्याच्या पौगंडावस्थेतील भावविश्वाचे इतके छान चित्रण करण्यासाठी मनही तेवढेच लहान मुलाचे असावे लागते. वनवास वाचल्यावर वनवास हाही खर्या अर्थाने आनंदवासच असतो हे प्रकाश नारायण संतांचे मत तुम्हालाही पटते. हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल.

( वनवास लेखक: प्रकाश नारायण संत प्रकाशन: मौज )

-nile

Thursday, April 24, 2008

निबंद - पावूस!

मला आलेल्यी एक फोरवर्ड मेल ... हा सुद्धा एक निबंधच आहे ... पावसावर

मुळ लेखाचा उगम मला नुकताचा मिळाला http://rahulphatak.blogspot.com/2007/05/blog-post_24.html