Showing posts with label गीतकार. Show all posts
Showing posts with label गीतकार. Show all posts

Wednesday, April 30, 2008

गुलजारची गाणी : कल्पनेच्या भरा-यांकडून वास्तवतेच्या पाय-यापर्यंत

{ महाराष्ट्र टाइम्स वरील गुलजार च्या गाण्याबद्दलच्या लेखा मधील काही भाग थोडक्यात }

'मुझको कोई अपना दे जा
मुझको कोई सपना दे जा
हल्का फुल्का शबनमी
रेशम से भी रेशमी...
''सदमा' सिनेमातल्या गाण्यातल्या या ओळी। एखादं मोरपीस गालावरून फिरावं इतक्या हळुवारपणे हे शब्द आपल्या मनाला मोहरून टाकतात. गुलजारच्या अशा मुलायम शब्दांबाबत बोलण्यासाठीही आपल्याकडेच शब्द शिल्लक राहत नाहीत.

गुलजार म्हटलं की कानात अनेक गाणी रूंजी घालू लागतात। एरवी फिल्मी गाणी आपल्याला पटकन आठवत नाही. पण 'थोडीसी बेवफाई'मधलं राजेश खन्नावर चित्रित झालेलं 'हजार राहे मूड के देखी, कही पे कोई सदा न आई...' हे गाणं एकदा रेडिओवर ऐकलं आणि प्रश्न पडला... इतक्या वर्षांनंतरही इतकं ताजं का वाटतं? काही उलगडाच होईना. मग कधीतरी या गाण्याचे गीतकार गुलजार असल्याचं ऐकलं आणि या ताजेपणाचं रहस्य लक्षात आलं. गाणं कधीही जुनं वाटणार नाही, असे हुकमी शब्द वापरण्याचं सामर्थ्य गुलजारकडे आहे. आजच्या संदर्भात बोलायचं झालं तर 'आंखे भी कमाल करती है पर्सनल से सवाल करती है...'असं गुलजार सहज लिहून जातो. त्यातला 'पर्सनल से सवाल' आपल्याला खटकतही नाही. आपल्या रोजच्या बोलण्याच्या भाषेत अशा अनेक शब्दांचा वापर सहज करत असतो. त्यामुळेच अशी रचना शब्दही आपल्याला परकी न वाटता आपलीच वाटू लागते.

हिंदी सिनेमातल्या गीतकारांच्या गर्दीत गुलजार नेहमीच वेगळा वाटतो। त्याच्या गाण्यातले शब्द, प्रतिमा, उपमा कधीही परग्रहावरच्या वाटल्या नाही. प्रत्यक्षात त्याच्या गाण्यातल्या अनेक प्रतिमा या खरं तर आपल्या कल्पनेपलीकडच्या...आवाक्यापलीकडच्या. पण त्या इतक्या सहजतेने वापरलेल्या असतात की आपण नकळत हळवं होऊन जातो. 'एकसो सोला चांद की राते...' असं म्हणत गुलजार उपमांच्या आकाशात नेतो आणि मग अचानकपणे त्याच्या पुढच्या 'और तुम्हारे कांधे का तील' या शब्दांतून तो आपल्याला उपमांच्या आकाशातून अलगद जमिनीवर आणून सोडतो. वास्तव आणि कल्पनेच्या जगात गुलजार अतिशय सहजतेने वावरतो. पण आपण मात्र कधी त्याच्या वास्तवात जमिनीवर वावरतो, तर कधी त्याच्या रोमँटिझम'च्या आकाशात फिरू लागतो... अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला गुंतवून ठेवण्याची, बंदिस्त करण्याची ताकद केवळ गुलजारमध्येच आहे.

सिनेमासाठी गाणी लिहणारा म्हटलं की तो शायर राहत नाही। हव्या त्या चालीवर शब्द बांधून देणारा गीतकार ठरतो. जेव्हा सिनेमाला चांगली पटकथा, मेलोडिअस संगीत असायचं, अशा वेळी गुलजारच्या शब्दाला वेगळीच चमक यायची. 'आंधी'मधलं 'इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते...' किंवा 'मौसम'मधलं 'दिल ढुंढता है फिर वोही, फुरसत के रात दिन...' ऐकताना हे फिल्मी गीत आहे, असं म्हणण्याचा कोणी मूर्खपणा करणार नाही.

सिनेमात रूळलेली माणसं सिनेमाशिवाय कशाचा विचार करत नाही। त्यांच्या माणूस म्हणून सिनेमाखेरीज कोणत्याच संवदेना शिल्लक राहत नाहीत. पण गुलजार कवी म्हणून संवेदनशील आहे, तसाच तो पटकथा लेखक, संवादलेखक म्हणूनही आहे. 'साथिया' सिनेमातल्या एका गाण्यात, 'दोस्तो से झुठीमुठी दुसरो का नाम लेके तेरी मेरी बाते करना' किंवा 'सत्या' सिनेमात 'सारा दिन रस्ते पे खाली रिक्षेसा पिछेपिछे चलता है' इतकं वास्तववादी लिहतो. पण याच सिनेमातल्या 'बादलों से काट काट के कागजो पे नाम जोडना' असं लिहून गुलजार एकदम स्वप्नाळू उपमा देऊन जातो. किंवा अनेकदा आपण कधी त्यांनी वापरलेल्या उपमांनी थक्क होतो. तरी 'गीला पानी', 'कांच के खाब', 'कोहनी के बल पे चलता चांद' अशा उपमा सहजपणे त्याच्या फिल्मी गाण्यात येऊन जातात.

'दिलसे रे' गाणं ए। आर. रहमान आणि शाहरूख खानचं. या दोघांच्या तरुणाईत गुलजारचे शब्दही तितक्याच ताकदीने तरुण झाले होते. 'चल, छय्या छय्या' म्हणताना आपण नकळत कधी ताल धरतो ते कळत नाही. पण 'ऐ अजनबी, तू भी कभी आवाज दे कहीं से...' म्हणताना त्यातला शायर अजूनही कायम आहे, हे सांगून जातो. 'घर' या सिनेमासाठी गुलजारने एकाहून एक सरस गाणी लिहिली. 'कांच के खाब है, आंखो में चुभ जायेंगे', असं लिहणारा गुलजार 'बोतल से एक रात चली है, खाब उडाके रात चली है', असंही म्हणतो. त्यामुळेच तो अजब रसायन असल्याची खात्री पटून जाते.

गुलजार काळाप्रमाणे, नव्या पिढीप्रमाणे बदललाय। पण त्याच्या जुन्या कवितांमधला, गाण्यांमधला फ्रेशनेस मात्र अजिबात कमी झालेला नाही. म्हणूनच तर तो आजच्या पिढीला जितका आपला वाटतो, तितकाच आधीच्या पिढ्यांनाही. मग ती पिढी ग्रामीण भागातली असो वा शहरी॥!

{ मूळ लेख बघण्यासाठी इथे click करा महाराष्ट्र टाइम्स }